करमाळा_चौफेर (शंभू फरतडे/ संजय जाधव)
करमाळा तालुक्यातील केम येथे ज्ञानेश्वर गोडसे या शेतकऱ्याच्या डाळिंब बागेवर चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास धाडसी दरोडा टाकून अंदाजे 20 लाख रुपये किमतीची डाळिंब लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. तयार झालेला माल रातोरात गायब झाल्याने संबंधित शेतकरी हवालदिल झाला असून पोलीसांपुढे आरोपी शोधण्याचे मोठे आव्हान उभे राहिले आहे.सदर प्रकार ३० एप्रिल च्या दरम्यान घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केम येथील प्रगतशील शेतकरी गोडसे यांनी व्याजाने कर्ज काढून, लाखो रुपये खर्च करून डाळिंब बाग फुलवली होती. बाजारात चांगला भाव मिळेल या आशेने काढणीची तयारी सुरू असतानाच चोरट्यांनी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत संपूर्ण बाग फस्त केली. अज्ञात वाहनाने डाळिंब नेल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. बागेत फिरत असताना शेतकऱ्यांना हि बाब लक्षात आली असल्याने प्रकार उघड आला.
सहाय्यक कृषी अधिकारी, केम श्री. वाल्मिक आप्पा चौधरी यांनी स्वतः स्थळपाहणी करून चोरीचा पंचनामा अहवाल’ दिला असून ,अहवालानुसार गट नंबर 368/1/ड मधील 0.70 हे. क्षेत्रात 665 डाळिंब झाडे आहेत. प्रती झाड 15 किलो या सरासरीने एकूण 9975 किलो उच्च प्रतीची फळेचोरीला गेली. सध्याचा बाजार भाव 205 रु. किलो धरता चोरीस गेलेल्या मालाची एकूण किंमत 20,44,875 रु.एवढी होते असे अहवालात नमूद केले आहे.
नदी काटच्या विद्युत पंपाच्या व काॅपर वायर चोरांनी धुमाकूळ घातला असताना शेतातील पिंकावर येवढ्या मोठ्या धाडसी दरोड्याने पोलीस देखील चक्रावून गेले आहेत. पोलीसांपुढे हे नवीन आव्हान उभे ठाकले आहे.
या बाबत चौफेर शी बोलताना शेतकरी ज्ञानेश्वर गोडसे म्हणाले कि, माझी पावणेदोन एकर बाग असून साडेसहाशे फुट लांबीचा पट्टा आहे. मि एकटाच झोपायला असतो खालच्या बाजूने माल काढलेला लक्षात आले नाही. दोन दिवस त्यांनी माल चोरला असावा अशी शंका व्यक्त केली.
●आद्याप गुन्हा दाखल नाही!●
सदर प्रकरण घडल्यानंतर शेतकरी पोलीस स्टेशन ला चकरा मारत आहेत मात्र गुन्हा किंवा शेतकऱ्यांकडून अर्ज देखील दाखल करून घेतलेला नाही. आज पोलीसाच्या पथकाने बागेची पहाणी केली आहे .या संदर्भात कसा गुन्हा दाखल होणार, व या घटनेचा तपास लागणार का? या कडे तालुक्याचे लक्ष लागले आहे
