करमाळा_चौफेर
कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीर मासेमारी करून सुमारे 60 हजार रुपये किमतीचे 500 किलो कोळंबी व कटला जातीचे मासे चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी करमाळा पोलिस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलेश्वर (ता. परांडा, जि. धाराशिव)येथील महावीर विलास भोई (वय 39) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ‘छत्रपती मत्स्य व्यवसाय संस्थे’चे ते संचालक असून कोळेगाव धरणात मासेमारीसाठी 2025 ते 2029-30 पर्यंत शासनाचा वैध करार त्यांच्याकडे आहे.
मागील काही दिवसांपासून मासे कमी मिळत असल्याने संशय आल्याने वॉचमनला लक्ष ठेवण्यास सांगितले होते. 18 मे रोजी रात्री 10 ते 19 मे पहाटे 5 दरम्यान कोळेगाव धरण व निमगाव ह परिसरात संशयीत आरोपींनी बेकायदेशीर मासेमारी केली. कामगारांनी हटकले असता मासे घेऊन पळ काढला. असे तक्रारीत नमूद केले आहे.
फिर्यादी च्या म्हणण्यानुसार , नंतर संशयीत आरोपी महिलांनी आमच्या वॉचमनला अश्लील शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी तक्रार देण्याची धमकी दिली.असे देखील म्हटले आहे.
या प्रकारणात पोलिसांनी पिंटू रामसिंग सल्ले, तानाजी विक्रम नगरे, पदमसिंह शिंदे, राजेंद्र दयराम सल्ले, बालाजी मच्छिंद्र नगरे, मच्छिंद्र नगरे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 च्या कलम 303(2), 351(2), 352 व 3(5) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस हवालदार मयुर गव्हाणे पुढील तपास करत आहेत.
“आम्ही रितसर करार करून जवळपास ४४ लाख रू भरून कायदेशीर मार्गाने ठेका घेतला आहे. धरण परिसरातील २३ ग्रामपंचायत व ५ मासेमारी संस्थेला आम्ही नोटीस देऊन कळवले आहे की ,धरणात मासेमारी करायची असेल तर आमच्या कडे लेखी अर्ज करून अधिकृत पास घेऊन मासेमारी करावी व आमच्याकडेच त्याची विक्री करावी यास आमची हरकत नाही, परंतू काही मच्छिमार चोरून मासेमारी करून बाजारात चढ्या दराने विक्री करत आहेत. त्यामुळे अधिकृत परवाना असून देखील आमचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. प्रशासनाने मासे चोरांवर कठोर कारवाई करावी”.- महावीर विलास भोई (संचालक छत्रपती मत्स्य व्यवसाय संस्था आलेश्वर)
