षषकरमाळा_चौफेर
राजुरी ता.करमाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुण्या ग्रामपंचायत कार्यालयात केलेल्या अतिक्रमणाचा वाद आता थेट न्यायालयात पोहचला आहे. या प्रकरणी सामाजिक कार्यकर्ते अजय साखरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे.
साखरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायत मालकीच्या जुण्या ग्रामपंचायत कार्यालयात झालेले अतिक्रमणा बाबत वारंवार ग्रामसेवक आणि सरपंच यांच्याकडे विचारणा केली. मात्र त्यांच्याकडून उडवाउडवीची उत्तरे मिळाली. अतिक्रमण धारक खासगीत “सरपंच व ग्रामसेवक माझ्या खिशात आहेत, ही जागा लवकरच नावावर करून घेणार” असे बोलत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.
या नंतर साखरे यांनी पंचायत समिती कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर जुन्या ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले. मात्र ग्रामपंचायतने प्रसिद्धीकरण आणि लिलाव न करता पुन्हा त्याच व्यक्तीला बेकायदेशीर ठरावाद्वारे जागा दिली. तसेच अतिक्रमण धारकाने केलेला फर्निचर खर्च भाड्यात दाखवण्याचा प्रयत्न केला.
या प्रकरणानंतर अजय साखरे यांनी पंचायत समितीसमोर उपोषण सुरू केले होते . या आंदोलना नंतर बेकायदेशीर भाडे ठराव आणि फर्निचर खर्चाचा ठराव रद्द करून २०० रू प्रती महिना प्रमाणे दहा वर्षाचे २४ हजार रू भाडे वसूल करून गाळा सील करण्याचे आदेश पंचायत समितीकडून देण्यात आले.मात्र तरीही चौकशी अधिकारी,ग्रामपंचायत प्रशासन आणि सत्ताधारींनी कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याचा आरोप तक्रारदारांनी केला आहे.
सध्या अतिक्रमण धारकाने ग्रामपंचायतीविरुद्ध कोर्टात धाव घेतली आहे. कोर्टाने पंचायत समिती आणि ग्रामपंचायतीला नोटी बजावली आहे. आता कोर्टाचा निकाल काय लागतो याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
●विभागीय आयुक्तांकडे तक्रार करणार●
“ग्रामपंचायत आणि पंचायत समिती प्रशासनाने फक्त कागदोपत्री घोडे नाचवून दिशाभूल केली. ग्रामपंचायतीची मालमत्ता असतानाही अतिक्रमण धारकाला कोर्टात जाण्याचा सल्ला दिला. हा ‘उलटा चोर कोतवाल को डांटे’ असा प्रकार आहे. मात्र न्यायदेवतेवर विश्वास आहे आणि सत्याचा विजय होईल” असे अजय साखरे यांनी सांगितले.
