करमाळा_चौफेर (शंभू फरतडे ✍️)
हिवरे गावचे सुपुत्र तथा नामवंत अभ्यासक -लेखक प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांना ‘महाराष्ट्र रत्न’ पुरस्कार जाहीर झाला आहे. तेजस सेवा प्रतिष्ठान, अहिल्यानगर या शासनमान्य स्वयंसेवी संस्थेने त्यांच्या आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार जाहीर केला आहे.
हा पुरस्कार दिनांक 6 जून 2026 रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु भीमराव आंबेडकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
तेजस सेवा प्रतिष्ठानच्या वतीने भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षपूर्तीनिमित्त महाराष्ट्रातील सामाजिक, औद्योगिक, शैक्षणिक क्षेत्रातील 75 नामवंतांची निवड करण्यात आली आहे. यामध्ये प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांना पुरस्कार निवडीचे पत्र प्राप्त झाले आहे.
डॉ. ओहोळ यांनी नुकतेच भारतीय संविधानाच्या मागील 75 वर्षांचा मागोवा घेणारा ‘भारतीय संविधान आणि लोकशाही अमृत महोत्सवी वाटचाल: एक दृष्टिक्षेप’ हा संदर्भ ग्रंथ लिहिला आहे. त्यांच्या या अभ्यासपूर्ण लेखनाची आणि आजवरच्या सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय सेवेची ही पोहोच असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या पुरस्कार प्राप्तीबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून प्रा. डॉ. जयसिंह ओहोळ यांचे अभिनंदन केले जात आहे.तसेच हिवरे येथील ग्रामस्थांनी देखील डाॅ ओहोळ यांचे अभिनंदन केले आहे.

