करमाळा_चौफेर
“आदिनाथ कारखान्याच्या भ्रष्टाचारावर बागल गट मौन बाळगून असताना, उपसभापती अजित विघ्ने मात्र बागलांची बाजू मांडत आहेत. यावरून ‘अॅड. विघ्नेंनी बिगर फी ची बागलांची वकिली करू नये’, असा खोचक टोला पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी लगावला आहे.”
काल पाटील गटाने बागल गटावर आदिनाथच्या अधोगतीबाबत गंभीर आरोप केले होते. मात्र बागल गटाकडून खंडन न होता माजी आमदार संजयमामा शिंदे गटाचे उपसभापती अजित विघ्ने यांनी प्रत्युत्तर दिले. या वेळेस विघ्ने म्हणाले होते की आदिनाथ अडचणीत असताना व बागल पाटील सत्तेत असताना एकत्रीत पणे प्रयत्न करून आदिनाथ वाचवण्या ऐवजी नारायण पाटील गटाने पळ काढला तसेच कामगार यांना भडकण्याचे काम पाटील गटाकडून केले. आज पाटील गट सत्तेत आहे त्यांनी प्रचारात “आदिनाथ मधून सोन्याचा धूर काढू” असे आश्वासन दिले होते ते पुर्ण करण्या ऐवजी भूतकाळात कुणी काय केले हे सांगून गुळवे व बागल यांना पाटील गटाच्या प्रवक्त्यांनी टार्गेट करू नये असे विघ्ने यांनी सुनावले होते.
यावर अक्रमक झालेले तळेकर म्हणाले, “आम्ही जास्त काळ सत्ता भोगलेल्या बागल गट नेतृत्वास प्रश्न विचारले. बागल गटाकडूनच उत्तरे अथवा खंडन अपेक्षित होते. परंतु विघ्नेंनी बागल कुटुंबाचे राजकीय वकीलपत्र स्वीकारण्याचे काही कारण नाही.” “मराठीत एक वाकप्रचार आहे – ‘उगाचच खलबत्त्यात डोके घालणे’. याचा अर्थ दुसऱ्याच्या वादात विनाकारण मध्यस्थी करून स्वतःसाठी डोकेदुखी निर्माण करणे. याची प्रचीती अजित विघ्ने यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे” असे तळेकर म्हणाले.
“बागल गटाच्या मदतीने उपसभापती पद मिळवलेल्या अजित विघ्ने यांनी बागलांच्या घरी पाणी भरण्यापर्यंत आपल्या पदाची गरीमा कमी करू नये” असा घणाघात देखील तळेकरांनी केला. “जो बागल गट आदिनाथ कारखान्याच्या अधोगतीस कारणीभूत आहे, त्या बागल गटाच्या नेतृत्वास उत्तर अथवा स्पष्टीकरण देऊ द्यावे.” किंवा हिम्मत असेल तर, बागल व शिंदे गटांनी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन आदिनाथच्या इतिहासाबद्दल बोलावे” असे आव्हान तळेकरांनी दिले.
बागलांनीच आदिनाथ कर्जाच्या खाईत लोटला यावर आम्ही ठाम आहोत. याउलट साखर कारखाना बंद पाडणारे आणि कारखाना चालवता नाही आला म्हणून विकून टाकणारे बागल व शिंदे हे एकत्र येऊन एकमेकांना सावरत आहेत, ही बाब सभासदांच्या लक्षात आल्याशिवाय राहत नाही” असा स्फोटक आरोप तळेकरांनी केला.
“अजित विघ्ने हे आदिनाथच्या मागील सतरा वर्षाच्या कारभारावर बोलले तर एका तासात त्यांचे उपसभापती पद बागल गट काढून घेणार हे नक्की आहे. यामुळे आपले पद वाचवण्यासाठी अजित विघ्ने हे बागलांची बाजू मांडत आहेत” असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला.तसेच
“आदिनाथ कारखान्याबाबत आमदार नारायण आबा पाटील यांची भूमिका स्पष्ट आहे – आदिनाथ हा सभासदांच्या मालकी हक्काचा रहावा आणि उर्जित अवस्थेत यावा. यासाठी आबा शेवटपर्यंत लढा देत राहतील. वेळप्रसंगी आंदोलन करण्याची वेळ आली तरी हरकत नाही.”असे देखील तळेकर म्हणाले आहेत.
