करमाळा_चौफेर (शंभू फरतडे)
कोळगाव सबस्टेशनवरील शेतकऱ्यांची वीजपुरवठ्याबाबतची साडेसाती संपायला नाव घेत नाही अनेक आंदोलन, बातम्या झाल्यानंतर जाग आलेल्या महावितरणकडून कोळगाव येथे पाच एमव्हीए ट्रान्सफार्मर बसवण्यात आला. यानंतर कसा बसा आठ तास वीज उपलब्ध झाली आहे. मात्र व्होल्टेज कमी दाबाने येत असल्याने अनेक मोटरी स्टार्टर उचलत नाहीत, पाणी पूर्ण दाबाने मारत नाही. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात शेतीपिकांची भरणी करणे मुश्किल झाले असून हातातोंडाशी आलेली पिकं करपू लागली आहेत.
एकीकडे कमी दाबाने वीजपुरवठा होत असल्याने हैराण झालेल्या शेतकऱ्यांना व्होल्टेज कमी-जास्त होत असल्याने मोटारी-स्टार्टर जळण्याचे प्रमाण वाढल्याने आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.पूर्ण दाबाने पाणी मिळत नसल्याने , ऊस, भाजीपाला ,हिरवा चारा यांसारखी ऐन उन्हाळ्यातील पिकं करपू लागली आहेत. लाखो रुपयांचे नुकसान शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे.
सबस्टेशनला येणारे व्होल्टेज कमी दाबाने येत असल्याने सबस्टेशनवरून कमी दाबाने वीज सप्लाय करावी लागत आहे असे महावितरण कर्मचारी सांगत आहेत. मात्र किती दिवसांत सुरळीत होईल याचे ठाम उत्तर त्यांना देता येत नाही
शेतकऱ्यांना मात्र तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत असून या गंभीर प्रश्नाकडे एकाही लोकप्रतिनिधीचे लक्ष नसल्याचे दिसत आहे. 4 मे च्या पाणी टंचाई बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला, मात्र ठोस आश्वासन मिळाले नाही.
कोळगाव सबस्टेशन वरील शेतकऱ्यांच्या वीज समस्यांच्या साडेसाती चे रेकॉर्ड मात्र नोंद घेण्या जोगे झाले आहे.
