करमाळा_चौफेर
रविवारी सायंकाळी व रात्रीच्या सुमारास देवळाली व परिसरात अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार अवकाळी पावसाने हाहाकार माजवला. काही वेळातच होत्याचं नव्हतं झालं. शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेला. केळी, ऊस, कांदा, भाजीपाला, फळबागा अक्षरशः भुईसपाट झाल्या.
अचानक वातावरण बदलले. सोसाट्याचा वारा सुटला, त्यापाठोपाठ विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाने झोडपून काढले. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या, वीजपुरवठा खंडित झाला. नवीन बांधकाम सुरू असणाऱ्या भिंती कोसळल्या, घरावरील पत्रे उडून गेले. या घटनेत देवळाली येथील एक नागरिक जखमी झाला आहे.
शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जोपासलेली केळी, ऊस, कांदा अक्षरशः जमीनदोस्त झाली.काढणीला आलेला माल गेला काढणीसाठी तयार असलेले उत्पादन वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. शेडनेट-ठिबक फाटून मोठे नुकसान झाले आहे
माजी सरपंच आशिष (आण्णा) गायकवाड व त्यांच्या टीमने तात्काळ देवळाली गावातील सर्व नुकसानग्रस्त भागाची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. प्रशासनाने तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी केली असून महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून वस्तुनिष्ठ अहवाल शासनाकडे सादर करावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
