करमाळा_चौफेर
स्वामी चिंचोली (भिगवण) येथील दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने शैक्षणिक क्षेत्रात आणखी एक ऐतिहासिक मैलाचा टप्पा गाठला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असलेल्या दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) ‘स्वायत्त संस्था’ (Autonomous Status) दर्जा प्रदान केला आहे. युजीसी कडून २९ जुलै २०२६ रोजी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला.
युजीसी च्या स्वायत्त महाविद्यालय नियमावली, 2023 मधील तरतुदीनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून हा स्वायत्त दर्जा मंजूर करण्यात आला आहे. ६ जुलै २०२६ रोजी झालेल्या स्वायत्त महाविद्यालयांवरील स्थायी समिती च्या बैठकीतील शिफारशींनंतर हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. सध्या महाराष्ट्रातील ५ टक्क्यांपेक्षा कमी महाविद्यालयांना ‘स्वायत्त’ (Autonomous) दर्जा प्राप्त झाला असून, त्यामध्ये “दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स”चा समावेश होणे ही संस्थेसाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे.
स्वायत्त महाविद्यालयांनी युजीसी च्या नियमांचे पालन करत शैक्षणिक व प्रशासकीय मंडळाची स्थापना, स्वतंत्र परीक्षा व्यवस्था, पारदर्शक मूल्यमापन प्रणाली आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक गुण शैक्षणिक क्रेडिट बँक (Academic Bank of Credits -ABC) पोर्टलवर अपलोड करणे बंधनकारक राहणार आहे.स्वायत्त दर्जामुळे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) नुसार उद्योगाभिमुख, कौशल्याधारित आणि काळानुरूप अभ्यासक्रम विकसित करण्याचे स्वातंत्र्य मिळणार आहे.
नवीन पदवी (UG), पदव्युत्तर (PG), डिप्लोमा आणि प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. संस्थेच्या स्वतंत्र परीक्षा व्यवस्थेमुळे वेळेवर परीक्षा, जलद निकाल, सातत्यपूर्ण मूल्यमापन, प्रकल्पाधारित शिक्षण, इंटर्नशिप, संशोधन आणि कौशल्य विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांची रोजगारक्षमता वाढून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये प्लेसमेंटच्या संधी अधिक उपलब्ध होतील.
स्वायत्ततेमुळे पालकांना नियोजनबद्ध शैक्षणिक दिनदर्शिका, पारदर्शक मूल्यमापन आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची खात्री मिळणार आहे. प्राध्यापकांना आधुनिक अभ्यासक्रम तयार करण्याचे, संशोधन प्रकल्प राबविण्याचे आणि नाविन्यपूर्ण अध्यापन पद्धती अवलंबण्याचे अधिक स्वातंत्र्य मिळेल.ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवरच जागतिक दर्जाचे शिक्षण उपलब्ध झाल्याने परिसरातील सामाजिक आणि आर्थिक विकासालाही गती मिळणार आहे. उद्योगांच्या गरजेनुसार कुशल मनुष्यबळ तयार होऊन उद्योग-शिक्षण समन्वय अधिक बळकट होईल.
स्वायत्त दर्जामुळे दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सची राष्ट्रीय स्तरावरील ओळख अधिक भक्कम होणार असून, संशोधन, नवोपक्रम, आंतरराष्ट्रीय सामंजस्य करार (MoUs), संशोधनासाठी अनुदान तसेच भविष्यात Deemed University होण्याच्या दिशेने संस्थेची वाटचाल अधिक वेगाने होणार असल्याचे मानले जात आहे.

दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सने गेल्या काही वर्षांत गुणवत्तापूर्ण शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. संस्थेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय मानांकन (Accreditation), राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांचे (National & International Conferences) आयोजन, देश-विदेशातील नामांकित विद्यापीठे व उद्योग संस्थांसोबत सामंजस्य करार (MoUs), ), शिक्षक, प्रशिक्षण, कार्यशाळा आणि क्षमता विकास उपक्रम या सर्व प्रयत्नांमुळे संस्थेमध्ये गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक उत्कृष्टतेची मजबूत पायाभरणी झाली असून, त्याचेच फलित म्हणून UGC ने संस्थेला ‘स्वायत्त’ (Autonomous) दर्जा बहाल केला आहे.
याप्रसंगी दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष प्रा. रामदास मधुकर झोळ यांनी स्वायत्त दर्जा प्राप्त करण्यासाठी अथक परिश्रम घेतलेल्या संपूर्ण दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या टीमचे मनःपूर्वक अभिनंदन केले. त्यांनी प्राचार्य, संचालक, प्राध्यापक, अधिकारी, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, माजी विद्यार्थी तसेच संस्थेवर विश्वास ठेवणाऱ्या सर्व हितचिंतकांचे आभार व्यक्त केले.
यावेळी प्रा. झोळ म्हणाले, “स्वायत्त दर्जा ही केवळ संस्थेची उपलब्धी नसून ग्रामीण भागातील गुणवत्तापूर्ण उच्च शिक्षणाला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मान्यता आहे. हा सन्मान संस्थेतील प्रत्येक घटकाच्या समर्पण, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि टीमवर्कचे फलित आहे. भविष्यात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या धर्तीवर विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे, कौशल्याधारित आणि संशोधनाभिमुख शिक्षण देण्यासाठी दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स कटिबद्ध राहील.”
दत्तकला ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्ससाठी हा स्वायत्त दर्जा केवळ प्रशासकीय मान्यता नसून ग्रामीण भागातील उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेला मिळालेली राष्ट्रीय पातळीवरील मोठी दाद असल्याची भावना विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.


