करमाळा_चौफेर
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. करमाळा येथील ‘लीड स्कूल’मध्ये अनार्या कांबळे हिने ९६. २० टक्के गुण मिळवून प्रथम क्रमांकाचे यश मिळविले आहे. तर हदिया जनवाडकर (९४.४० टक्के) आणि अर्जुन जाधव (९३.८० टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक मिळवला आहे.
याशिवाय प्रचीती चिवटे (९१.४० टक्के), प्रिशा क्षीरसागर (९१.२० टक्के), श्रद्धा आढाव (९०.२० टक्के), शौर्य जाधव (८९.८० टक्के), ओमराज कांबळे (८८.६० टक्के), नमन दोशी (८८.२० टक्के), उदय जपे (८८ टक्के) या विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
दरम्यान ९६. २० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक मिळविणारी अनार्या ही शिक्षक सतिश कांबळे आणि शिक्षिका अनुराधा कांबळे (शिंदे) यांची कन्या असून ती मूळची तालुक्यातील वीट येथील आहे. या प्रभावी यशानंतर बोलताना अनार्या हिने शिक्षकांचे मार्गदर्शन, नियमितपणे केलेला अभ्यास आणि पालकांची साथ यामुळे यश मिळाल्याचे सांगितले.
लीड स्कुलने दहावी परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मधील या परीक्षेत विद्यालयातील सहा विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल बोलताना शाळेच्या प्राचार्या कामिनी जोशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांची मेहनत, शिक्षकांचे योग्य मार्गदर्शन आणि पालकांचे सहकार्य यामुळेच हे यश शक्य झाले आहे. शाळेचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्या कामिनी जोशी, वर्गशिक्षक शिवाजीराव दळवी तसेच इतर शिक्षकांनी अभिनंदन केले आहे.
पेढा भरवून अनार्याचे कौतुक करताना तिचे आई वडील.
