करमाळा_चौफेर
प्रजिमा-12 अंतर्गत रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव किमी 0/00 ते 25/00 या सुमारे 25 किलोमीटर लांबीच्या प्रमुख जिल्हा मार्गाच्या सुधारणा व बळकटीकरणासाठी एडीबी योजनेंतर्गत 200 कोटी रुपयांचा निधी प्रशासकीय मान्यतेसह मंजूर झाला आहे. ही माहिती भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा सोलापूर जिल्हा परिषद गटनेत्या रश्मी बागल यांनी दिली.
रश्मी बागल यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, करमाळा-माढा मतदारसंघातील रस्ते, पाणी, वीज व कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. केम परिसरातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून रोपळे–केम–कंदर–कन्हेरगाव या रस्त्याच्या दुरवस्थेबाबत मागणी करत होते. रस्ता पूर्णतः उखडल्याने विद्यार्थी, रुग्ण, शेतकरी व नोकरदार वर्गाला रोजच हालअपेष्टा सहन कराव्या लागत होत्या.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे या रस्त्यासाठी निधीची मागणी सातत्याने करण्यात आली. संबंधित विभागाकडे पाठपुरावा केल्यानंतर अखेर एडीबी योजनेंतर्गत या 25 किमी रस्त्यासाठी 200 कोटी रुपयांना मान्यता मिळाली आहे.
एडीबी योजनेंतर्गत राज्यातील ग्रामीण व राज्य मार्गांचे आधुनिकीकरण केले जाते. ग्रामीण भागातील रस्ते मुख्य महामार्गांशी जोडून दळणवळण सुलभ करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या निधीमुळे केम व माढा तालुक्यातील हजारो नागरिकांची वर्षानुवर्षांची मागणी पूर्ण होऊन दर्जेदार रस्ता तयार होणार आहे.
सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार असून त्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत या कामाचे भूमिपूजन करण्यात येणार असून प्रशासकीय प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याचे रश्मी बागल यांनी सांगितले.
“करमाळा तालुक्याच्या विकासासाठी पालकमंत्री मा. ना. जयकुमार गोरे सातत्याने सकारात्मक भूमिका घेत आहेत. कंदर–केम–रोपळे–कन्हेरगाव रस्त्यासाठी मंजूर झालेला 200 कोटींचा निधी हा त्याच प्रयत्नांचा भाग आहे. आगामी काळात रस्ते, पाणीपुरवठा, सार्वजनिक बांधकामे, आरोग्य सुविधा तसेच नवीन पोलीस ठाण्यासाठीही मोठा निधी उपलब्ध होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री जयकुमार गोरे व भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करमाळ्याचा सर्वांगीण विकास अधिक गतीने होईल”, असा विश्वास रश्मी बागल यांनी व्यक्त केला.
