करमाळा_चौफेर
रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या विहिरींचे काम अद्याप पूर्ण न होता त्यांचे बील ग्रामपंचायत कडे वर्ग केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील वीट येथे समोर आला आहे.याबाबत माजी उपसरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य हेमंत बाबुराव आवटे आणि हनुमंत दामू आवटे, रा. वीट, ता. करमाळा यांनी गट विकास अधिकारी, पंचायत समिती करमाळा यांच्याकडे दिनांक 24/08/2026 रोजी लेखी तक्रार अर्ज दाखल केला आहे.
अर्जदाराच्या म्हणण्यानुसार, वीट गावामध्ये रोजगार हमी योजनेतून विहिरी मंजूर झाल्या होत्या. त्यातील काही विहिरी पूर्ण झाल्याचे दाखवून त्यांची बीले योग्य प्रकारे मिळाली आहेत. परंतु गट नंबर 513 मधील लाभार्थ्यांच्या यांच्या विहिरीचे काम पूर्ण झालेले नसतानाही, त्या विहिरीचे बील पूर्ण दाखविण्यात आले आहे.
संगणका द्वारे एडीट करून विहरीची संरक्षक भिंत (रिंग) तयार केली व नोटकॅम द्वारे फोटो काढला असल्याचे दाखवले आहे असा तक्रारदार यांचा आरोप आहे. विहिरींच्या कामापैकी एका विहिरीचे बील चुकीच्या पद्धतीने दाखल करण्यात आले असून, या विहिरीचे काम अद्यापही झालेले नाही, तरीही अपूर्ण काम असून देखील पंचायत समितीने बील ग्रामपंचायतकडे वर्ग केलेले आहे. चुकीच्या पद्धतीने बीले दाखल करून अधिकाऱ्यांना हाताशी धरून बील लाटण्यात आले असल्याचा गंभीर आरोप अर्जात करण्यात आला आहे.
मा.उपसरपंच हेमंत आवटे व हनुमंत आवटे यांनी तक्रार अर्ज दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लाभार्थ्यांला पुन्हा तातडीने काम सुरू करण्याची सुचना दिल्याने आता काम सुरू केले आहे मात्र पंचायत समितीकडे बील काढण्यासाठी दाखल केलेल्या प्रस्तावावर लाभार्थ्यांना उभा करून काम पुर्ण झाले असल्याचा फोटो कसा अपलोड केला हा प्रश्न कायम आहे. विशेष म्हणजे सध्या ऑगस्ट महिना सुरू अतसाना सदर नोटकॅम फोटोवर काम पुर्ण झाल्याची तारीख ०८ |११\२०२६ दाखविण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणात जे अधिकारी व लाभार्थी दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करून दोषींना शिक्षा मिळावी, अशी मागणी अर्जदारांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती पंचायत समिती गट विकास अधिकारी ,पंचायत समिती सभापती, तहसीलदार करमाळा आणि जिल्हा परिषद सि ओ सोलापूर यांनाही देण्यात आल्या आहेत. या प्रकरणामुळे रोजगार हमी योजनेतील कामांच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पंचायत समिती प्रशासन यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

●घोटाळा उघड कसा झाला●
रोजगार हंमी अंतर्गत काम पुर्ण झाल्याचा प्रस्ताव प्रथम पंचायत समितीकडे सादर केला जातो. टप्या टप्यात पैसे शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होतात. सदर लाभार्थ्यांना बाकीची रक्कम मिळाली मात्र शेवटचे ६८९१० रू अनुदान ग्रामपंचायत कडे वर्ग करण्यात आले होते.हि रक्कम लाभार्थ्यांना मिळणार होती मात्र माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य हेमंत आवटे यांनी प्रस्ताव पाहिला व चौकशी केली असता विहरीची संरक्षक भिंत (रिंगचे ) काम प्रत्यक्षात सुरूच झाले नसल्याचे निदर्शनास आले. काम पुर्ण होण्या आगोदरच प्रस्ताव कसा तयार झाला ? याची चौकशी केली असता सदर प्रकरणाचा भांडाफोड झाल्याचे हेमंत आवटे यांनी सांगीतले.
संबंधित अर्जाची तातडीने दखल घेतली असून यात गैरप्रकार झाल्याचे अढळुन आल्यास दोषींविरुद्ध कारवाई केली जाईल.
-डाॅ अमित कदम – गटविकास अधिकारी पं.स करमाळा.
